Statewide re-verification of rickshaw permits; licence to be cancelled if Marathi is not known : १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; परिवहन विभागाची मोठी मोहीम
Buldhana बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परमिट मिळवल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे राज्याच्या परिवहन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील सर्व रिक्षा व टॅक्सी परवान्यांची सखोल पुनर्पडताळणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमेत केवळ कागदपत्रांची छाननी न होता संबंधित चालकाला मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, याचीही प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे नियमबाह्य पद्धतीने परवाने मिळवून रस्त्यावर उतरलेल्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राथमिक टप्प्यात मिरा-भाईंदर परिसरातून या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही ती टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत ही मोहीम राज्यभर चालवली जाणार आहे.
या फेरपडताळणीत जुन्या आणि नव्या अशा सर्व परवान्यांची काटेकोर तपासणी केली जाईल. वैध कागदपत्रे नसलेले किंवा बनावट पुराव्यांच्या आधारे परवाने मिळवलेले चालक आढळल्यास त्यांचे परवाने तातडीने निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहेत. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरीकरणामुळे रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली असून जिल्ह्यांसह अनेक शहरांत हजारो परमिट वितरित करण्यात आले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत काही अनधिकृत चालकांनी बोगस रहिवासी पुरावा, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे परमिट मिळवल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
constituency delimitation : रेषा सरकल्या की समीकरणे बदलणार; इच्छुकांची नव्या क्षेत्रात चाचपणी सुरू
नव्या आदेशानुसार १ मे, महाराष्ट्र दिनापासून मराठीचे प्राथमिक ज्ञान अनिवार्य राहणार आहे. तपासणीदरम्यान अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधून त्यांची प्रत्यक्ष क्षमता तपासणार आहेत. मराठी न येणाऱ्या चालकांवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई होणार आहे.








