We had high expectations from Fadnavis’ leadership : फडणवीस यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा होत्या
Nagpur Politics News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. नागपूरपासून ते मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहो. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. जे काय होईल ते होईल, असे राऊत म्हणाले. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ असू नये, असे आमचे प्रयत्न आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना त्या काळामध्ये अशा लोकांनी घेरलं होतं की त्यामुळे सर्वांचंच नुकसान झालं. त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा त्यांनी पूर्णपणे मलिन करून टाकली.
जाहीरनाम्यातील वचनं पूर्ण करावे लागतील
कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना, कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भाजपच्या जाहीरनाम्यात स्पष्ट लिहिलं आहे. आणि त्या भाजपच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार त्या विरोधात बोलत असतील तर काय समजावं? त्यांना जाहीरनाम्यातील वचनं पूर्ण करावे लागतील.
वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीचा खूप वेळ वाया गेला, असे वक्तव्य काल (10 जानेवारी) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यावर वडेट्टीवार काय बोलतात त्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही. हरयाणामध्ये आम्ही होतो का? तिथे काँग्रेस पक्षासमोर कोणीच नव्हतं. मग काँग्रेसचे तेथे का हारली. जम्मू-काश्मीरला का पराभूत झाली, असे सवाल त्यांनी केले.
ते तर कोट शिवून तयार होते
मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते, त्यात आम्ही नव्हतो. शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. अख्या देशभरात तुमचा पराभव का होत आहे. सर्वत्र संजय राऊत आहे का? विजय वडेट्टीवारही वाटाघाटीच्या बैठकीत उपस्थित होते. आघाडीमध्ये जो आघाडीची भूमिका स्वीकारत नाही, त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो, असे राऊत यांनी सांगितले.
मी नरेंद्र मोदींना माणूस नाही तर देवच म्हणतो. कारण ते विष्णूचे तेरावे अवतार आहेत. त्यांनी स्वतःच हे म्हटले होते, असे म्हणत राऊतांना मोदींवर खोचक टिका केली. लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवू.
लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले. पण अजूनही इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांची जबाबदारी आहे बैठक बोलावण्याची, असेही संजय राऊत यांनी सांगितले