Water scarcity plan has not been prepared : नियोजन शुन्य; पाणी टंचाईचा आराखडा तयारच झाला नाही
Wardha मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. परंतु जिल्हा प्रशासनच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अजूनही पाणीटंचाईचा आराखाडा तयार झालाच नाही आहे. मुख्य म्हणजे आता उन्हाळा डोक्यावर आला आहे. फेब्रुवारीतच उकाडा जाणवू लागला आहे. अशात कुठलेही नियोजन नसल्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम धरणामध्ये मुबलक पाणी आहे. परंतु दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात तापमान अजूनही वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भूगर्भातील पाणीची पातळी कमी होईल. सार्वजनिक विहिरी, बोअरची पाणीपातळी कमी झाल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण होईल. काही ठिकाणी टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्याला नुकताच प्रारंभ झाला आहे. धरणातील पाणीसाठाही चांगल्या स्थितीत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. समुद्रपूर तालुक्यातील नागरिकांनी पाण्यासाठी नुकतेच आंदोलनसुद्धा केले होते.
सध्या शहरामध्ये मोठमोठ्या इमारती निर्माण उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ १५ फुटांच्या अंतरावर जमिनीमध्ये बोअर मारले असल्यामुळे पाणीटंचाई जाणवते. एकाच ठिकाणी अनेक बोअर मारल्यामुळे जमिनीची चाळणी होऊन पाण्याची पातळी खालावत जाण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कृषिपंप, तसेच अन्य उपकरणे सुरू असल्यामुळे विजेचा जास्त वापर होत असतो. त्यामुळे वीज वितरण करत असताना लोड येत असल्यामुळे वीज गायब होण्याची शक्यता असते. ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करवा लागतो.
जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शासनदरबारी गेल्यावर्षी एकही टँकरचा उपयोग केला नाही. यावर्षीचा पाणीटंचाई आराखडा अजूनही तयार करण्यात आला नाही. पाणीटंचाईसंदर्भात तालुकानिहाय माहिती घेणे सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाणीटंचाई उपाययोजनेचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले.