Travel by AC bus with the same ticket if the bus breaks down : बस बिघडल्यास त्याच तिकिटात आता एसी बसने प्रवास
Wardha अर्ध्या प्रवासात बंद पडलेल्या, अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवासी घेण्यास उच्चश्रेणी बसचे चालक – वाहक टाळाटाळ करतात. मात्र, आता त्याच तिकीटात नियोजित स्थळी कुठल्याही बसेसमधून प्रवास करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात भर दुपारी एखादी बस बंद पडली. मागाहून एसी बस येत असेल तर प्रवाशांना त्याच तिकिटात पुढचा प्रवास करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे ब्रेकडाऊन वाढले आहे. देखभाल – दुरुस्तीकडे दुर्लक्ष, निम्न दर्जाच्या साहित्याचा वापर यामुळे हा प्रकार वाढला आहे. अपघातांची संख्याही अधिक आहे. याचा मन:स्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. मार्गावर फेल झालेल्या, अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवासी घेण्यास उच्चश्रेणी बसचे चालक-वाहक टाळाटाळ करत होते. आता हे चालणार नाही, असे महामंडळाने ठणकावले आहे.
फेल झालेल्या साध्या बसच्या प्रवाशांना उच्चश्रेणी बसमध्ये घ्यावे लागेल, असे एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातून सूचित केले आहे. मार्गावर असलेल्या निमआराम, शयनयान, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या उच्चश्रेणी बसच्या चालक-वाहकांनी फेल पडलेल्या साध्या बसेसच्या प्रवाशांना घ्यावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.
शिवाय साध्या बसच्या तिकीट दरातच ही सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महामंडळाने सर्व विभागांना आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. अनेक प्रकारच्या बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात आहेत. त्यात अश्वमेघ, शिवनेरी, शिवशाही, इलेक्ट्रिक यांसारख्या एसटी बसेसचा यामध्ये समावेश आहे. पूर्वी ज्या श्रेणीची बस आहे, त्याच श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. आता या नियमात सुधारणा करण्यात आली आहे.