Congress leader Nana Patole, Sulabha Khodke of NCP Ajit Pawar group slams Ashish Jaiswal : रोग निर्मूलन करण्यासाठी सरकार दुरगामी परिणाण करणारी यंत्रणा निर्माण करणार का ?
Mumbai : यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनावर विपरित परिणाम झालेला आहे. यासंदर्भात आज (४ जुलै) विधानसभा सभागृहात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सुलभा खोडके आणि भाजपचे सुमीत वानखडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला मंत्री आशिष जयस्वाल यांनी ‘अंशतः खरं आहे, अंशतः खोटं आहे..’, अशी उत्तरे दिली. त्यावरून या नेत्यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले.
या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, मंत्री आशिष जयस्वाल शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नावर परंपरागत उत्तरे देत आहेत. ते स्वतःसुद्धा संत्रा उत्पादक जिल्ह्यातील आहेत. संत्रा पिकावर रोग पडून किती नुकसान झाले, याची त्यांनाही कल्पना आहे. पण तरीही ते टाळाटाळीची उत्तरे देत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत करणार का आणि संत्रा पिकांवर जे रोग येतात, त्यासाठी दुरगामी परिणाम होणारी यंत्रणा सरकार निर्माण करणार का, याचे उत्तर मंत्री महोदयांनी द्यावे, असे नाना पटोले म्हणाले.
सुलभा खोडके म्हणाल्या, नागपूरपेक्षाही आमच्या अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन जास्त घेतले जाते. मोर्शी, वरूड हा पट्टा तर पूर्णपणे संत्र्याचा आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे नुकसान झालेले आहे. पण नुकसानाच्या टक्केवारीच्या भानगडीत नुकसान भरपाई दिली जात नाहीये. तर मे महिन्याच्या अखेरीस पाऊस झाला. या पावसाने मृगाचा बहर चांगला आला. त्यानंतर पावसाने जवळपास महिनाभर दडी मारली. परिणामी ६० ते ७० टक्के संत्रा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे याचे लवकर पंचनामे करावे, अशी मागणी सुमीत वानखडे यांनी केली.
तीन सदस्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, दरवर्षी रोगांचा प्रादुर्भाव हा काही प्रमाणात होत असतो. रोगाचे तीव्रता ५० टक्क्यांच्या वर गेली तर नुकसान होते. विभागाने सर्वेक्षण केले आहे. अमरावती विभागात १८ तर नागपूर विभागात सहा शेतीशाळा घेतल्या आणि इतर उपक्रमही राबवले. काही ठिकाणी पाच टक्क्यांपेक्षा जास्त रोग नसल्यामुळे मदत देण्यात येणार नाही. पण जास्त नुकसान झाले असल्यास तपासणी करून भरपाई देण्यात येईल.