School Education Minister taught poetry to students : शालेय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना शिकवली कविता
Nagpur शिक्षण मंत्री म्हटल्यावर लाल दिव्याच्या गाडीत येणारे साहेब, एवढीच सर्वसाधारण ओळख शालेय विद्यार्थ्यांना असते. पण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही पारंपरिक समज खोडून काढली आहे. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत आले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर कविता देखील समजावून सांगितली.
नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळा रोजच्या प्रमाणे सकाळी सुरु झाली. शालेय प्रार्थना व पाठ होत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेत पोहोचतात. तिथल्या शांततेला व शिस्तीत शाळेच्या ओट्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जातात. वडीलकीच्या नात्याने मुलांची चौकशी करतात.
खुद्द शालेय शिक्षणमंत्री शाळेत आले म्हटल्यावर शिक्षक, मुख्याध्यापक गोंधळणारच. पण असे काहीच झाले नाही. मुख्याध्यापिका विजया गोतमारे यत्किंचीतही गोंधळून न जाता विश्वासाने पुढे येतात. शाळेची संपूर्ण माहिती देतात. इयत्ता तिसरीतील मुलींसोबत गप्पा मारण्यात शिक्षणमंत्री रमून जातात. शाळेतल्या अडचणी जाणून घेतात. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी त्यांनी दिलेल्या विश्वासावर पुढे येते. ‘सर मी कविता वाचून दाखविते असे सांगून लय धरते.
शाळेतल्या या सकाळच्या वातावरणाला नुकताच उत्तरायणाकडे कललेला सूर्य उब घेऊन आलेला असतो. अशा या भारलेल्या वातावरणाला कशिश ‘पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम्… कौलारावर थेंब टपोरे तडम् तडतड तडम्’ हे बडबड गीत सादर करते. शिक्षण मंत्र्यांनाही तिसरीच्या भाव विश्वात घेऊन जाते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे मुलींच्या गुणवत्तेचे कौतुक करतात. त्यानंतर ते शाळेच्या ओट्यावर बसून मुलांना कविता समजावून सांगतात.
शिक्षण मंत्र्यांनी कळमेश्वर येथील नगर परिषदेची शाळा, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कळमना संजय नगर येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळा याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे व वरिष्ठ अधिकारी होते. कळमेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावर उपचार केले जातात का याची माहिती घेतली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये चर्मरोगासारखा आजार वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिक्षकांनी त्याबाबतही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजे असे सांगितले. स्वच्छतागृहांची देखील त्यांनी पाहणी केली.