Amravati-Pune flight to start soon : दोन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न, क्रीडा साहित्याचे वितरण
Amravati “अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी ‘वंदे भारत’ ट्रेनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे विकसित भारताच्या संकल्पनेचा भाग आहे. आता येत्या काळात अमरावती–पुणे विमानसेवा सुरू करून या दोन महत्त्वपूर्ण शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी माहिती अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
येथील विभागीय क्रीडा संकुलात कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, रवी राणा, राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, “शेकडो खेळाडू पुण्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान सुलभ वाहतूक सुविधा असणे गरजेचे आहे. आज देशात प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडत असून क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बदलत्या काळात मातीवरील कुस्तीइतकीच मॅटवरील कुस्ती महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून अमरावतीला क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न होईल. यासाठी पुरेशा आर्थिक मदतीची हमी दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
संकुलाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. व्यायामशाळा बांधणीसाठी १५ लाख आणि खेळमैदानाच्या दुरुस्तीसाठी २५ लाखांचा निधी दिला जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा साहित्याचे ९४ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. यावेळी कुस्तीगीर परिषदेकडून पालकमंत्र्यांना चांदीचा गदा देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव यांनी केले.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, “विदर्भाचा नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याला ‘विदर्भाचे काश्मीर’ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इको-टूरिझम अंतर्गत एका महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. चिखलदऱ्यातील कोलकाससह आणखी चार प्रकल्प प्रस्तावित आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.