Find a source of income through agro-based industries : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे संशोधकांना आवाहन
Nagpur ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपुरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात अधिक शाश्वत करायचे आहे. पण त्यासाठी हवामान बदलाचा विचार करावा लागेल. प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्यांचे काटेकोर नियोजन करावा लागेल. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची अन्न सुरक्षा निश्चित करावी लागेल. शेतीपूरक उद्योगांतून चांगल्या उत्पन्नाची संसाधने अधिक भक्कम करावी लागतील. यासाठी संशोधकांनी पुढे यावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (सोमवार) केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषदेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या समारंभाला पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., भारतीय कृषी अनुसंसाधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, पशुविज्ञान शाखेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्ट, कुलगुरु डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे व ज्येष्ठ संशोधक उपस्थित होते.
पशुधन, वनसंवर्धन, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीबाबत भारतीय संस्कृतीने आपल्याला एक अमूल्य देणगी दिली आहे. आपल्या देवी-देवतांनी देखील आपले वाहन पशुधनातून घेतले आहे. पुर्वापार चालत आलेल्या परंपरा व ज्ञानाच्या आधारावर शेतीला पशुधनाची जोड दिली. यातून अतिरिक्त उत्पादकता आपल्या पुर्वजांनी घेऊन दाखविली. या क्षेत्रातील संशोधकांनी कालपरत्वे दिलेल्या योगदानाच्या साहाय्याने प्रगतीचा एक मोठा पल्ला आपण गाठू शकलो, याचाही उल्लेख पंकजा यांनी केला.
Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर
आजच्या घडीला दुधाच्या उत्पादनात आपण जगात प्रथम क्रमांकावर आहोत. अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा देण्याचे सामर्थ्य पशुवैद्यकीय शास्त्रात असल्याचे त्यांनी सांगितले.
उपलब्ध साधनसंपत्तीत वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे दुध, मांस, अंडी उपलब्ध व्हावेत. यातील पोषण मुलद्रव्य वाढण्यासह पर्यावरणातील संतुलनही राखले जावे. यादृष्टीने आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषद महत्त्वाची आहे. या निमित्ताने आपण सर्व संशोधक एकत्र येऊन या क्षेत्राला नवी दिशा द्याल, याची खात्री असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.