Build mud houses not cement : गरजांना ब्रेक लावण्याचा सोनम वांगचुक यांनी दिला सल्ला
Nagpur सिमेंटची घरे पर्यावरण पूरक नाहीत. सिमेंटचा वापर पूर्णपणे बंद करावा, असे नाही. मात्र सिमेंटची गरज केवळ २० टक्केच आहे. उड्डाणपूल आणि बहुमजली इमारत उभी करण्यासाठी सिमेंट लागते. मात्र घर उभे करण्यासाठी मातीचा वापरच उत्तम आहे, असे आवाहन पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी केले.
अधिकाधिक संशोधन करून मातीची चांगली घरे निर्माण होऊ शकतात. मात्र सहज उपलब्ध असणाऱ्या मातीकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी खंत मॅगसेसे पुरस्कार विजेते, प्रख्यात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली. आयटी पार्क मार्ग येथील परसिस्टंट सिस्टम कंपनीच्या एपीजे अब्दुल कलाम सभागृहात आयोजित कार्यक्रमात वांगचुक यांनी पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पर्यावरणाला होत असलेल्या धोक्यांची माहिती करून दिली. तसेच नागरिकांना अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
CM Devendra Fadnavis : सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा !
ग्रीन नागपूर, ग्रीन लिडर्स, फ्रेंड्स ऑफ लडाख आणि फ्रेंड ऑफ नेचर, स्वच्छ असोसिएशन या संस्थांच्या पुढाकारने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनसूया काळे, कुणाल मौर्य, जयदीप दास, अक्षिता व्यास आदी उपस्थित होते. वेगवेगळे प्रकल्प सरकारकडून येत आहेत. मात्र जनता मालक आहे. अलादीन जीनकडे जे मागतो ते तो त्याला उपलब्ध करून देतो. इथे जनता अलादीन आहे आणि सरकार जीन आहे. पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही, असेच मागणे जनतेने मागायला हवे. त्यामुळे सरकारला नाही तर स्वत:ला दोष द्या. लोकशाहीच्या आयुधांचा वापर करून लोकचळळ उभी करा, असा सल्लाही वांगचुक यांनी दिला.
पैशांमुळे आनंद मिळतो मात्र तो एका ठिकाणी स्थित होऊन आनंदाचा ग्राफ नंतर कमी कमी होत जातो, असे वांगचुक म्हणाले. प्रीती पटेल यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, वांगचूक यांनी रविवारी सकाळी मानकापूर क्रीडा संकुल परिसरात पर्यावरण प्रेमींसोबत विविध विषयांवर चर्चा करत ‘नेचर वॉक’ केला. शहरी वन यात्रा असा हा उपक्रम राबविण्यात आला. लडाखमधील नैसर्गिक परिस्थितीला तोंड देत तिथे पूर्वजांनी कशापद्धतीने हिरवळ तयार केली. याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र ग्लोबल वार्मिंगमुळे हिमखंड वितळत आहे. त्यामुळे गंगेसारख्या मोठमोठ्या नद्या कोरड्या पडतील, असा धोकाही त्यांनी वर्तविला.
शुद्ध हवा मागा
सरकार जनतेवर प्रकल्प लादत नाही तर जनतेला जे हवे आहे त्याची पूर्तता करते. त्यासाठीच सरकारकडून विविध प्रकल्प उभारले जातात. मी विकासाच्या विरोधात नाही. प्रकल्प नकोच असेही मला म्हणायचे नाही. मात्र पर्यावरणाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशा प्रकल्पांच्या अतिरेकाला प्रतिंबंध बसायलाच हवा. यासाठी सरकारला नाही तर लोकांना बदलवा. सरकार आपोआप बदलेल, असे आवाहन वांगचुक यांनी केले.