The government is interested in increasing our difficulties : एस.टी. कर्मचारी संघटनांचा आरोप; ३ मार्चला आत्मक्लेष आंदोलन
Akola सरकार वारंवार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढवण्यातच अधिक रस आहे. असा आरोप एस.टी. कर्मचारी संघटनांनी केला आहे. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी ३ मार्च रोजी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात एसटी कामगार सेनेने विभागीय कार्यालयांना नोटीस देऊन तीन मार्चपूर्वी सर्व मागण्यांवर चर्चा करण्याची विनंती केली आहे.
एस.टी. कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, सरकारने वेतनवाढ, निवृत्तीवेतन आणि कामाच्या योग्य अटींसंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. परिणामी, कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचा रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर ३ मार्च रोजी राज्यभरातील एस.टी. कर्मचारी आत्मक्लेष आंदोलन करतील. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. संघटनांनी स्पष्ट केले आहे की, हा लढा कर्मचारी हक्कांसाठी असून सरकारने त्वरित तोडगा काढावा.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी कामगार सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरल्याने कामगार सेना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र आहे.
संघटनांच्या प्रमुख मागण्या..
प्रलंबित वेतनवाढ त्वरित लागू करावी
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी आणि इतर लाभ तत्काळ द्यावेत
सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी संख्येत वाढ करावी
कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करावा