Encroachment removal campaign in Mehkar in controversy : राजकीय सूडबुद्धीचा आरोप, व्यापाऱ्यांचे साखळी उपोषण
Mehkar मेहकर शहरात नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून सध्या तीव्र वाद निर्माण झाला असून, व्यापाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. ही मोहीम राजकीय सूडबुद्धीने राबवली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष किशोर गारोळे यांनी केला आहे. “गरिबांच्या पोटावर पाय देऊन त्यांचा घास हिसकावू नका!” असे भावनिक आवाहन करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
किशोर गारोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मेहकर शहरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, मुदत दिल्याशिवाय अतिक्रमण हटवली जात आहेत. डोणगाव रोड, जानेफळ रोड, बसस्थानक परिसर, राजमाता जिजाऊ चौक ते महादेव वेटाळ मार्ग या भागात ही कारवाई मनमानी पद्धतीने सुरू आहे.”
Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!
त्यांनी आरोप केला की, ही मोहीम केवळ राजकीय विरोधकांना लक्ष्य करून राबवली जात असून, “माझे स्वतःचे अतिक्रमण काढण्यासाठीच ही मोहीम उभी करण्यात आली आहे. माझे अतिक्रमण हटवायचे असल्यास निःसंकोच करा, पण सामान्य व्यापाऱ्यांवर अन्याय करू नका,” असे गारोळे म्हणाले.
मोहीमेमुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. “आमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. पर्याय न देता हटवणं अन्यायकारक आहे,” अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या किंवा संबंधित प्रशासनाच्या वतीने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या कारवाईमागे कोणती भूमिका आहे, हे स्पष्ट करणे आता गरजेचे बनले आहे. स्थानिक राजकारणात या मोहिमेमुळे तापलेले वातावरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.