ABVP taught there should be no rush to join politics : अभाविपच्या विदर्भ प्रांत अधिवेशनात गडकरींनी साधला संवाद
Nagpur ‘विद्यार्थी परिषदेत प्रत्येक जण काहीतरी शिकलेला आहे. मी व्यक्तिगतरित्या काम सुरू केले, तेव्हा माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती. पण मला इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घाईने राजकारणात जायला नको, याची शिकवणही मिळाली,’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्याचवेळी त्यांनी राजकारणात येण्याची घाई करणाऱ्यांनाही टोला लगावला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५३व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुरुवात झाली. अधिवेशनातील ‘रिअल लाईफ रोल मॉडेल’ या सत्रात गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘अनेक लोक नाराज होतात. ते म्हणतात आमचा फोटो बॅनरवर लागला नाही. मी त्यांना सांगतो की तुमचा फोटो बॅनरवर लावण्यासारखा नसेल म्हणून नाही लागला. फार लवकर प्रसिद्ध होण्याची धडपड असते. एखादा प्रसंग घडला की त्यांची कॉलर एकदम टाईट होते. ‘साला मै तो साहब बन गया… रे साहब बन के कैसा तन गया’ असा त्यांचा तोरा असतो.’
Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘न्यायमूर्तींनी आम्हाला शिक्षा दिली नाही आणि निर्दोषही सोडले नाही!’
ते पुढे म्हणाले, ‘उत्तम प्रशिक्षण, संस्कार झाल्याशिवाय राजकारणात जायला नको, हे मदनदासजींनी आम्हाला सांगितले. पाच वर्षे उत्तम काम करायचे आणि त्यानंतर राजकारणात जायचे, असे ते सांगायचे. मला राजकारणात यायची घाई नव्हती. पण त्यांच्या उपदेशांचा मला फायदाच झाला.’
आजचा नागरिक कसा असावा, त्याला उत्तम नागरिक म्हणून कसे घडविले पाहिजे, याला व्यक्तिनिर्माण म्हणतात. हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सांगितले जाते. आपण कार्यकर्त्याला गुणदोषांसह स्विकारत असतो. कारण कुणीही परफेक्ट नाही. आपण सगळे अपुर्णांक आहोत. विद्यार्थी परिषदेत काम करताना आपले व्यक्तिमत्व कसे घडविले जाणार आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे. कारण विद्यार्थी परिषद तुमचे व्यक्तिमत्व घडविणार आहे, असंही गडकरी म्हणाले.