Takeoff of Amravati residents from Belora Airport will be delayed : एअरलाइन्सच्या अधिकृत घोषणेअभावी संभ्रम कायम
Amravati : बेलोरा विमानतळावरून ३१ मार्च रोजी प्रवासी विमानाचे उड्डाण होईल, अशी घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. विमानतळासाठी डीजीसीएचा परवानाही मिळाला. दिवसा विमानोड्डाणासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून ‘अलायन्स एअर’ला विमानोड्डाणासाठी सेटअप उभारण्याचे पत्रही देण्यात आले. मात्र, यामध्ये स्टेपअपचीच अडचण निर्माण झाली आहे.
एअरलाइन्सच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) अद्याप ना बेलोरा विमानतळाचे नाव आहे, ना तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. कारण, ‘अलायन्स एअर’ने विमानतळावर आवश्यक सेटअपच उभा केलेला नाही. त्यामुळे ३१ मार्चला प्रत्यक्षात विमानोड्डाण होईल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
Mahayuti Government : भावांतर योजनेचेही गाजर, यानंतर लोक महायुतीला संधी देतील का ?
शासनाची घोषणा; पण एअरलाइन्सची नाही..
राज्य शासनाने जाहीर केले असले तरी ‘अलायन्स एअर’ने अद्याप विमानोड्डाणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कारण, प्रत्येक एअरलाइन्सला उड्डाणापूर्वी तांत्रिक आणि प्रशासनिक तयारी करावी लागते. ७२ आसनी प्रवासी विमानाची उपलब्धता, वैमानिक, एअर होस्टेस व क्रू मेंबर्सची नियुक्ती, विमानतळावर चेक-इन, चेक-आऊट आणि सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या बॅग्ज तपासणी यंत्रणेची उभारणी करावी लागते.
१५ दिवसांचा कालावधी आवश्यक..
कोणत्याही एअरलाइन्सला प्रवासी विमान सेवा सुरू करण्यासाठी किमान १५ दिवस लागतात, असे विमानोड्डाण तज्ज्ञ गौरव उपश्याम यांनी सांगितले. एअरलाइन्सला पूर्ण तयारी करून विमानतळावर ऑपरेशन सुरू करावे लागते. तांत्रिक चाचण्या आणि आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्याशिवाय तिकीट विक्री सुरू केली जात नाही. ‘अलायन्स एअर’ने अद्याप अधिकृतपणे तिकीट जारी केले नसल्यामुळे ३१ मार्चच्या उड्डाणावर अनिश्चितता आहे.
Akola Municipal Corporation : अकोलेकरांचा प्रवास होणार वातानुकुलीत, ४२ ई-बसेस मंजूर
अमरावतीकरांना आणखी प्रतीक्षा?
जर ‘अलायन्स एअर’ १५ दिवसांच्या कालावधीत सेटअप पूर्ण करू शकली, तरच विमानोड्डाण शक्य होईल. अन्यथा, अमरावतीकरांना विमानसेवेसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे चित्र आहे.