BJP won Delhi, AAP’s defeat is certain : आपची गच्छंती अटळ, काँग्रेसचा सलग तिसऱ्यांदा भोपळा
New Delhi तब्बल २७ वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीने विजय संपादन केला आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपने आघाडी घेतली. ही आघाडी कायम राखली असून दुपारपर्यंत भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत असलेली आपची सत्ता संपुष्टात येणार हे, स्पष्ट झाले आहे.
दिल्लीला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा व सुषमा स्वराज हे मुख्यमंत्री राहिले. परंतु १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता हातात घेतली. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात सलग १५ वर्षे काँग्रेसने सत्ता कायम राखली. त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीचा उदय दिल्लीत झाला.
Sudhir Mungantiwar : देशाच्या प्रगतीमधील केजरीवाल नावाचा अडसर हटला !
२०१३, २०१५ व २०२० या तीन निवडणुकांमध्ये आपने सत्ता कायम राखली. परंतु भाजपच्या झंझावातापुढे आपचा झाडू हवेत उडाला आहे. यामुळे तब्बल २७ वर्षांनंतर भाजपची सत्ता दिल्लीत येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत भाजपला कधीही यश मिळाले नव्हते. परंतु यावेळी भाजपचे नेते कामाला लागले होते. यावेळी कोणत्याही स्थितीमध्ये भाजपची सत्ता आणायची, या विश्वासाने त्यांनी काम केले व सत्ता संपादन केली. काँग्रेसला गेल्या तीन निवडणुकीमध्ये एकही आमदार दिल्लीत निवडून आणता आलेला नाही.
मुख्यमंत्री कोण?
आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हा मुख्य प्रश्न आहे. माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र परवेश वर्मा, माजी खासदार रमेश बिधुडी, विजेंद्र गुप्ता, विरेंद्र सचदेव इच्छुक आहेत. यांपैकी कुणाची वर्णी लागणार की, धक्का तंत्रातून नव्या गड्याच्या हातात दिल्ली सोपविणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे.