No Proposal for MNS to Join Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील समावेशाबाबत सपकाळ स्पष्टच बोलले
New Delhi मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत. त्याबाबत निर्णय घ्यायचाच असेल तर इंडिया आघाडी घेईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. सपकाळ म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच लोकशाही व संविधानाच्या संवर्धन व संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष लढा देत आहे. या लढाईत देशभरातील अनेक पक्ष सहभागी होत इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील,’ असे सपकाळ म्हणाले.
निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत पण मागील काही निवडणुकांमध्ये घोटाळे करण्यात आले. मतदार याद्यांमध्ये गडबड करण्यात आली. मतचोरीचा प्रकार राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केला आहे. हाच मुद्दा घेऊन राज्यात विविध पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली, असेही त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : जनतेच्या मनातील स्थान हेच सर्वात मोठे सिंहासन !
या शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होते. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आघाडी वा युतीचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.