Principal commits disgusting act with tribal girls : आदिवासी मुलींसोबत किळसवाणे कृत्य; दालनात बोलवून छळ
Gadchiroli कायदे कठोर झाले, शिक्षा होऊ लागली आहे. पण तरीही विकृतीचा कळस रोज बघायला मिळत आहे. गडचिरोलीच्या दुर्गम भागात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील चारपेक्षा अधिक अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत किळसवाणे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवून मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील शिवणी येथे एका तरुणीस अमानुष मारहाण करुन लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रवींद्र उष्टूजी गव्हारे (४६) असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. कुक्कामेटा या आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या चार मुलींसोबत गैरकृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तपासात पीडित विद्यार्थिनींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एका महिला पालकाच्या तक्रारीवरुन लाहेरी उप पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द ५ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार महिलेच्या ९ वर्षीय मुलीसह नात्यातील ११ वर्षीय मुलगी व अन्य दोन मुलींचाही समावेश आहे. रजिस्टर आणून देण्याच्या बहाण्याने तो मुलींना आपल्या दालनात बोलवायचा.
गेल्या आठ दिवसांपासून तो त्यांच्याशी अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कारवाईचे आदेश दिल्यावर उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी गुन्हा नोंदवून घेत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याच्या मुसक्या आवळल्या.
जि.प. सीईओ ZP CEO सुहास गाडे यांनी या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्रा.) बाबासाहेब पवार यांना तातडीने मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याच्याविरुध्द कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव बनविण्याची लगबग ६ मार्चला जिल्हा परिषदेत सुरु होती. अतिदुर्गम, दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो.
Vijay Wadettiwar : अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात झाल्यास मंत्री जबाबदारी घेतील का?
आता कुक्कामेटा गावातील घटनेने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी एटापल्ली येथे तालुकास्तरीय संमेलनादरम्यान भररस्त्यात काही शिक्षक मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, पण त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. प्रशासन गैरवर्तन करणाऱ्यांना अद्दल घडवून जरब कधी बसविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.