Will the government decide to waive the farmers’ loans? : बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
Buldhana निवडणुकीच्या वेळी राजकीय पुढाऱ्यांनी मोठमोठी आश्वासने दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तर आवर्जून मांडण्यात आला. त्यानंतर निवडणूक झाली. निकाल लागला. महायुती सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-मंत्री ठरले. पण अजूनही सरकारने कर्जमाफीच्या मुद्यावर एक शब्दही काढलेला नाही. आता तर पालकमंत्र्यांचीही नियुक्ती झाली आहे. आता तरी सरकारला जाग येणार आहे का, असा संतप्त सवाल बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी विचारला आहे.
कर्ज माफ हाेईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणाच केला नाही. रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. नवीन कर्ज घेण्यासाठी जुन्या कर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. व्याजाची रक्कम भरल्यानंतर बँका गेल्यावर्षीच्या कर्जापेक्षा १० टक्के अधिक कर्जाची रक्कम देतात. मात्र कर्ज माफ हाेण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाच्या नूतनीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
Wardha Police : जीवापाड प्रेम होते, पण त्याने व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली!
रब्बी हंगाम संपत आला तरी पीक कर्ज वाटप संथगतीने सुरू आहे. त्यातही शेतकरी नवीन कर्ज घेण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे आतापर्यंत केवळ ७ टक्के शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात ६९ हजार २०० शेतकऱ्यांना ७०० काेटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आतापर्यंत केवळ ४ हजार ७३७ शेतकऱ्यांना ६२ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ९३ टक्के शेतकरी रब्बी हंगामातील पीक कर्जापासून वंचित आहेत.
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये १ लाख ५३ हजार ५०० शेतकऱ्यांना १५०० काेटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट हाेते. त्यापैकी ६८ हजार ७९ शेतकऱ्यांना ७७६ काेटी ९५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफीचा निर्णय हाेत नसल्याने ६८ हजार शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.